बीएसएनएल




‎"हॅलो, बीएसएनएल का ? "
" हो, बोला "
" अहो ब्रॉडबँड बंद पडलेय "
" तुमचंच नाही, सगळीकडेच बंद आहे"
" का हो ? "
" टेक्निकल प्रॉब्लेम" खाSSड फोन बंद
*****

" हॅलो, बीएसएनएल ? "
" दोन दिवस झाले नेट बंद आहे हो, कामं अडलीयेत "
" काय करू साहेब ? सगळ्यांची तीच बोंब आहे"
" नक्की काय प्रॉब्लेम आहे हो ? "
" एक्चेंजमधे उंदराने केबल खाल्ल्यात "
" काय सांगता ? तरी किती वेळ लागेल चालू व्हायला ? "
" काही सांगता येत नाही केबल शोधायला वेळ जाणारच " खाSSड फोन बंद
*****

"हॅलो बीएसएनएल ?"
" बोला "
" तुमच्या एक्चेंजमधे प्रॉब्लेम आहे ना "
" हो ना साहेब, केबल खाल्ल्या उंदरांनी "
" मी तुमची काही मदत करू शकतो का ? "
" तुम्ही टेलिकॉम वाले का हो ? "
" नाही, पण मी थोडं सुचवू शकतो "
" सांगा की साहेब "
" तुम्ही ना ! चार-पाच मांजरी पाळा वाटल्यास मी एक देतो.... फुकटात "
खाSSड फोन बंद
*****

"हॅलो बीएसएनएल ? "
" बोला "
" अहो मघाशी फोन केलेला मी ते मांजरीचं तेवढं ..."
" अहो साहेब कशाला मस्करी करता ? मांजरी पाळल्यानं काय होणार आहे ? "
" अहो त्या उंदीर खातील ना ! त्या काही केबल खात नाहीत "
" आणि मग मांजरी बाहेर कशा काढायच्या ? "
" कुत्रे देतो ना दोन, चांगले गलेलठ्ठ "
"च्यायला...... "खाSSड फोन बंद
*****

" हॅलो बीएसएनएल ? "
" हे बघा तुम्हीपण मांजर पाळायचे सल्ले देणार असाल तर.... "
" नाही हो, कुणी दिला होता का असला सल्ला ? "
" नायतर काय साहेब, इथे आमची हालत झालेय आणि लोकांना मस्करी सुचते"
" तुम्ही सध्या काय प्रोटेक्शन घेताय ? "
" आँ, कसलं ओ कसलं ? "
" अहो एक्स्चेंज साठी म्हणतोय मी "
" चालू आहेत प्रयत्न "
" मी सर्व्हिस देऊ का ? "
" काय करता आपण ? टेलिकॉम मध्ये आहात का ? "
" नाही हो, सर्पमित्र आहे " खाSSड फोन बंद
*****

" हॅलो बीएसएनएल का ? "
" तुम्हीपण सर्पमित्र आहात का ? "
" का ? तुम्ही आहात ? "
" नाही हो, मघाशी कुणीतरी त्रास देत होतं, तुमचा काय प्रॉब्लेम आहे ? "
" अहो नेट बंद आहे गेले चार दिवस "
" एक्सचेंजमध्ये उंदरांनी वायर चावल्यानं बंद पडलंय ते, काम चालू आहे"
" पण मी काय म्हणतो, "
" बोला "
" तुम्ही केबलना उंदराचं औषध लावून ठेवा म्हणजे बघा की उंदीर पडलेला असेल तिथेच शोधायची केबल "
" तुम्ही तेच कालचे का हो ? "
" नाही मी उंदीर मारायचं औषध विकतो एकदम जहाल आहे बघा उंदीर फूटभर पण लांब जाऊ शकत नाही "
" ....... " खाSSड फोन बंद
*****

" हॅलो बीएसएनएल ? "
" नेट चालू झालेय "
" मी विचारत होतो तुमच्याकडे एखादी कादंबरी किंवा डीव्हीडी आहे का हो ? "
" हे टेलिफोन एक्सचेंज आहे लायब्ररी नाही "
" नाही त्याचं काय आहे ते नेट ..... "
" सांगितलं ना चालू झालंय "
" हो तेच ते पण ते किंचित स्लो आहे, मला एक मेल पाठवायचंय तर ते लिहून पूर्णं होईपर्यंत तेवढाच टाईमपास एखादी कादंबरी वाचून झाली असती हो "
" आयची.... "
*****

" हॅलो बीएसएनएल ? "
" आता नेट व्यवस्थित चालू आहे "
" ते माहीताय मला पण.. "
" पण काय ? "
" तेवढा उंदीर सापडला का ते विचारायचं होतं "

हल्ली म्हणे बीएसएनएल त्या कॉलरला शोधतायत म्हणे, त्याचं कनेक्शन बंद करण्यासाठी. मला भीती नाही मी बरेच जणांचे फोन वापरलेत.
.......source internet

Marathi Abhiman Geet

मराठी अभिमान गीत.........


लाभले  आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी
जाणतो मराठी, मानतो मराठी
दंगते मराठी, रंगते मराठी,
स्पंदते मराठी, गर्जते मराठी
गुंजते मराठी, गर्जते मराठी

आई - वडिलांची साथ एक हृदयास्पद कथा ! आवर्जून वाचा ....




एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहात होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नयेम्हणून दिवसरात्र एक करून ती काम करत असे; पण त्या छोट्या मुलाला मात्र, आपली आई अजिबात आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करत असतो; कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो.

एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागते; पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे मुलाला कळत नाही . रागाचा एककटाक्ष टाकून तो तिथून पळून जातो. घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो.""कशाला आली होतीस शाळेत? आता माझे मित्र मला चिडवतील? मी उद्या शाळेत कसा जाऊ? तुला एक डोळा का नाही?मला तू अजिबात आवडत नाहीस.'' वगैरे वगैरे. आई काहीही बोलत नाही. आपण आईला खूप बोललो, याचे मुलालाही काही वाटत नाही. रागाने तो नुसता धुमसत असतो. आईशी काहीही न बोलता जेवतो आणि झोपतो. रात्री कधीतरी त्याला जाग येते; तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा दबक्‍या आवाजात त्याची आई रडत असते. पण त्याचेही त्याला काही वाटत नाही. एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो.

त्या क्षणी तो निर्णय घेतो, शिकून खूपमोठे व्हायचे आणि इथून बाहेर पडायचे.
त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करतो. उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो.नामवंत विद्यापीठातून पदवी मिळवतो. मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्‌द्‌यावर काम करू लागतो. एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न होते. त्याला एक मुलगा, एक मुलगी होते. आता त्याचे कुटुंब पूर्ण होते; कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची त्याची आई तिथे नसते. तो तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो. अतिशय सुखात असतो.

एक दिवस त्याच्या घराचे दार वाजते. दारात एका माणसाबरोबर त्याची तीच एकाडोळ्याची आई उभी असते. तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते. तोआधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो, ""कोण आहेस तू? इथे का आलीस? बघ माझी मुलगी तुला घाबरली.''
""मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले,'' असे काहीसे पुटपुटत आई निघून जाते. तिने आपल्याला ओळखले नाही, अशा समाधानात (?) मुलगा दार लावून घेतो.
काही दिवसांनी, माजी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते. परत त्या गावात जाऊ नये असे वाटत असतानाही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो. ऑफिसच्या कामासाठी जातोय, असे बायकोला खोटेच सांगतो.
संमेलन पार पडते. कुठल्यातरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात. दाराला कुलूप असते. शेजारची बाई त्याला ओळखते आणि एक पत्र देते. ते पत्र त्याच्या आईचे असते.
तो वाचू लागतो,

""... मी खूप आयुष्य जगले. तुझ्याकडे आता मी परत कधीही येणार नाही; पण तू कधीतरी येऊन मला भेटावेस अशी माझी खूप इच्छा आहे. शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळले होते; पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी नक्की ठरवले. कारण मला माहिती आहे, एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही. मला एकच डोळा का, असेही तू मला एकदा विचारले होतेस. तेव्हा तू खूपच लहान होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही; पण आज सांगते. बाळा, तू लहान असताना एक अपघात झाला. त्या अपघातात तू तुझा एक डोळा गमावलास. एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला. मला तुझा खूप अभिमान आहे. तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागावलेले नाही."तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे,' असाच विचार मी करते. कधी काळी माझ्या भोवतीभोवती खेळणारा तू मला नेहमी आठवतोस...''

पत्र वाचून मुलगा ढसढसा रडू लागला.. जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली, स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिनं त्याला सहजपणे देऊन टाकला, तिच्याशी आपण किती निर्दयपणे वागलो. त्याला प्रचंड पश्‍चात्ताप झाला, तो आईला मोठमोठ्याने हाका मारू लागला; पण आता त्याचा काय उपयोग होता??

मित्रानो आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा.
पण..
कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू नका;
कारण जीवनात
एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल;
... पण

आई -वडिलांची साथ ही नेहमीच तुमच्या बरोबर आयुष्यभर असेल !

आम्ही कोल्हापुरी .........

प्रसिध्दीपासून दूर राहिलेली तरीही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वत:चा लौकिक टिकवून राहिलेलं पादत्राण म्हणजे आपली कोल्हापुरी चप्पल!

माणसानं जे काही शोध लावलं त्यातला पादत्राणाचा शोधही महत्त्वाचा. पायाला बोचणाऱ्या दगडांचा, काट्यांचा त्रास चुकविण्यासाठी आदिमानवाच्या काळात पायाला पाला किंवा झाडाची साल बांधण्याची पध्दत होती. ग्रीस, इजिप्त या देशातील उत्खननात त्यावेळची पादत्राणे मिळाल्याचा उल्लेख आढळतो. इ. स. पूर्व काळात पादत्राणे वापरली जात. नंतरच्या काळात मेलेल्या किंवा मारलेल्या प्राण्यांच्या चामड्याला योग्य आकार देऊन ते पायाला बांधले जाई.

भारतातील पादत्राणासंबंधी वैदिक वाड्:मयात उल्लेख आढळतो. रोमनकालीन पादत्राणांशी त्याचं साम्य आढळतं. पुणेरी जोडा, जयपुरी चढाव याबरोबरच कोल्हापुरी चपलांची निर्मिती झाली. पुणेरी जोडा जरी जवळ जवळ नाहीसा झाला तरी जयपुरी चढाव आणि कोल्हापुरी चप्पल मात्र टिकून आहेत. कोल्हापुरी चपलांची जुनी नावं म्हणजे खास कोल्हापुरी, खास कुरुंदवाडी, खास कापशी! गावांच्या नावावरुन दिलेली. शिवाय पुडा मोरकी, पुडा पॅचिंक, पुडा अथणी, गांधीवादी अशी नावे अलिकडच्या बदलत्या काळात म्हणजे चित्रपटांच्या जमान्यात कोल्हापुरी चपलेने सुरक्षा, सिलसिला, सुहाग, जंजीर, नाचे मयूरी, दिल, मेरी आवाज सुनो, महाभारत अशीही नावे धारण केली असली तरी आपला मूळचा दर्जा व वैशिष्ट्ये कधीच सोडली नाहीत.

कोल्हापूरी चप्पल पूर्णत: कातड्याची असल्याने उन्हाळयातसुध्दा थंडपणा जाणवतो. शिवाय चालताना त्रास होत नाही. कारण त्या पूर्णत: हाताने बनविलेल्या असतात. त्या बनविण्याचे ९० ते ९५ टक्के काम महिला कामगार करतात. कोल्हापूर जिल्ह्यात या चपला तयार करुन उपजीविका करणारी साधारणत: सात हजारावर कुटुंबे आहेत. चपलांची किंमत वापरलेल्या कातड्याच्या दर्जाप्रमाणे असते


AAMHI KOLHAPURI 

कोल्हापूर तरुण मंडळ

कोल्हापूरच्या तरुण मंडळांची नावंसुद्धा भन्नाट आहेत. झाड ग्रुप, कलकल तरुण मंडळ, अचानक मित्र मंडळ, लेटेस्ट तरुण मंडळ, पॉवरफुल्ल चिक्कू मित्रमंडळ...! यावर रिसर्च करणं आवश्यक आहे. रिक्षाच्या मागील बाजूस किंवा मडफ्लॅपवर लिहिलेला मजकूरसुद्धा असाच अभ्यास करण्यासारखा. "बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलाय वाघानं', "तशी मी गावायची नाय,' वगैरे... हे सुचतं कसं, यापेक्षा ही या गावाची ओळख बनत गेली आहे, हे महत्त्वाचं! चेष्टामस्करीलासुद्धा एक खुलेपणा असावा लागतो. तो इथं आहे. इथं अनेक "टर्मा'ही (टर्म) तयार झाल्या आहेत. उदा. रंगाखुष, पाला झाला, हारकुन टुम्म! चेष्टा कुठं करावी यालाही इथं मर्यादा नाहीत. एखाद्या अंत्ययात्रेत प्रेताला खांदा दिलेला समोरून येणाऱ्याला इथे सहज विचारून जातो, ""काय, बसणार काय डब्बलशीट?'' खऱ्या अर्थानं हे सारं आघळपघळ.

जगात भारी आम्ही कोल्हापुरी

जोतिबा डोंगरी आणि महालक्ष्मीच्या दारी,
डोक्यावरती फेटा आणि गळ्यात साज हा भारी,
परंपरा आणि कला , संस्कृती ची किमया प्यारी ,
जगात हो SS , जगात हो SS .....................
जगात भारी आम्ही कोल्हापुरी...........................

आनखिन काय बोलाव कोल्हापुर बद्दल , बोलाल तेवढ कमीच...
येथील रस्त्यावर पहिला मान इथल्या म्हशींचा...
नंतर रस्त्याच्या मधीच निवांतपणे मित्रांशी गप्पा मारनाराया मुलांचा .....
आणि जगा मिळाली तर गाड़ी चालावानार्यांचा....
इथे सिग्नलवर गाड़ी रेस करायची नाही...
कुणाला खुन्नस द्यायची नाही ..........
इथल्या मुली सुधा मित्राना 'भावा' म्हणतात...........
इथे कुठल्याही मुलीला रिस्पोंस विचारा , उत्तर एकच ... मी एंगेज आहे ...
इथे पान टपरी कमी पान शोरूम्स जास्त आहेत ...उदा. भैया पान भवन ....
इथे रंकला हा जीव् तर पंचगंगा नदी ही प्रतेक माणसाची रक्तवाहिनी आहे ...............
इथे भेल फ़क्त राजाभाऊ ची आणि मिसळ फ़क्त फडतरेंचिच चालते..........
इथे वर्तमानपत्र म्हणजे पुढारी आणि बिस्किठाचा पुडा म्हणजे फ़क्त पारले..........

------------------------------------ by Pankaj Mengane

"50 years onward march from region to global vision." Shivaji University, Kolhapur. A glorious evening.

नोकरीविषयी एसएमएसद्वारे माहिती उमेदवारांनी मोबाईलची नोंद करावी

कोल्हापुरच्या जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयांमध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांना संगणकीय प्रणालीद्वारे एसएमएसद्वारे मोबाईलवर विविध प्रकारचे संदेश देण्याचे योजिले आहे. पात्र उमेदवारांची नोकरीसाठी नियोक्त्याकडे पाठवणी झाल्यास एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. याशिवाय नुतनीकरणाच्या सुचना, रोजगार मेळाव्यातून होणारी भरती याविषयीचे संदेश देण्यात येणार आहेत. उमेदवारांनी या सुविधेचा लाभ मिळण्यासाठी नाव नोंदणी करताना अद्यावत मोबाईल क्रमांकही नोंदवावा. मोबाईल क्रमांक बदलला असल्यास तशी नोंद करावी.
          नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांनी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात मोबाईल क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल पत्ता असल्यास नोंद करावी. कार्यालयाच्याhttp://ese.mah.nic.inया संकेतस्थळावर माझ्या संपर्कामध्ये बदल या ऑप्शनवर क्लीक करुन उमेदवारांना कोठूनही आणि केंव्हावी हा बदल करता येईल. एसएमएस सेवेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी आपल्या नोंदणीची माहिती अद्ययावत करावी असे आवाहन कोल्हापुरच्या रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्गाचे सहाय्यक संचालक वसंत माळकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२३१/२५४५६७७ वर संपर्क साधावा.