प्रसारमाध्यमांनी पत्रकारितेची मूलभूत वैशिष्ट्ये जपावीत - राष्ट्रपती

जनतेशी उत्तरदायित्व असणारे सार्वजनिक हिताचे विषय ठळकपणे मांडून सकारात्मक बदल घडविण्यामध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची असते. असे करताना प्रसारमाध्यमांनी प्रामाणिकता, वस्तुनिष्ठता आणि निष्ठा ही जबाबदार पत्रकारितेची मूलभूत वैशिष्ट्ये लक्षात ठेऊन काम केले पाहिजे. याबाबत कोणतीही तडजोड करता कामा नये, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी केले. 

मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात बुधवारी आयोजित ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अँवार्डस् २०११’ च्या वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल के.शंकरनारायणन, देविसिंह शेखावत, गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत, महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, लोकमत समूहाचे प्रमुख खासदार विजय दर्डा, गुप्ता कॉर्पोरेशनचे संचालक पद्मेश गुप्ता, चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आदी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रपती म्हणाल्या, स्वतंत्र भारतामध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका ही राष्ट्रीय कार्यांना प्रोत्साहन देणारी आणि राष्ट्रीय उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी जनमत तयार करणारी असावी. तसेच लोकशाही व्यवस्थेला सुदृढ आणि सुयोग्य बनविण्याची जबाबदारीही प्रसारमाध्यमांवर आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे माध्यमांची ताकद वाढली असली तरी त्यांच्या जबाबदारीतही वाढ झाली आहे. सुदृढ समाजमनाच्या जडणघडणीमध्ये माध्यमांचा महत्त्वाचा वाटा असून त्यांनी त्याचे भान ठेवणे गरजेचे आहे.

हल्ली प्रसारमाध्यमांत काही नवीन पायंडे पडत आहेत त्यावर विचार होण्याची गरज आहे. माध्यमांच्या अतिव्यावसायिकीकरणाचा मोठा प्रश्न आहे. ब्रेकिंग न्यूजद्वारे पहिला येण्याच्या प्रयत्नांमध्ये काहीवेळा घटनांची सत्यता पूर्णपणे पडताळून न पाहता व खात्री करुन न घेताच बातमी दिली जाते. या विषयाला गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचेही राष्ट्रपतींनी सांगितले. 

श्रीमती पाटील म्हणाल्या, स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच आपल्या लोकशाही प्रणालीमध्ये सर्व नागरिकांकरिता न्याय, स्वातंत्र्य व समता प्रदान करणाऱ्या आपल्या घटनेचे, लोकशाही हे अधिष्ठान आहे. नागरिकांना आपल्या कर्तव्याची जाण असेल आणि एका मजबूत राष्ट्राच्या निर्मितीसाठी ते सदैव कार्यरत असतील या भूमिकेवर, लोकशाही आधारलेली आहे. त्यामुळे आपण जबाबदारीने वागले पाहिजे, तसेच आपल्या विशाल आणि विविधतेने नटलेल्या देशासाठी, त्याला एकत्रित व मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असणारा सामाजिक सद्भाव आणि सहिष्णूता कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. प्रत्येक देशाप्रमाणे, आपल्यापुढेही अनेक समस्या आहेत, आव्हाने आहेत, मतभेद आहेत. पण ते विधायक दृष्टीकोनातून, आपल्या देशाच्या स्थिरतेला व उज्ज्वल भवितव्याला धक्का न लागू देता सोडविले पाहिजेत. देशातील गरिबी दूर करण्यासाठी सामाजिक अजेंड्याकडे लक्ष देण्याचे आवाहन यावेळी श्रीमती पाटील यांनी केले. 

या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना ‘लोकमत जीवन गौरव’ तर अमिताभ बच्चन यांना ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर मानबिंदू’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. इतर क्षेत्रात ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अँवार्ड’ पुरस्काराने डॉ.हिम्मतराव बावसकर (विज्ञान व तंत्रज्ञान), बंडोपंत खेडकर (कला), वीरधवल खाडे (क्रीडा), पारोमिता गोस्वामी (समाजसेवा व लोकसेवा), हनुमंत गायकवाड (उद्योग), कवी किशोर कदम (साहित्य), शेख नासीर शेख नियाझ (मनोरंजन) तर खासदार राजू शेट्टी (राजकारण) यांना गौरविण्यात आले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय दर्डा यांनी केले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.