आम्ही कोल्हापुरी .........

प्रसिध्दीपासून दूर राहिलेली तरीही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वत:चा लौकिक टिकवून राहिलेलं पादत्राण म्हणजे आपली कोल्हापुरी चप्पल!

माणसानं जे काही शोध लावलं त्यातला पादत्राणाचा शोधही महत्त्वाचा. पायाला बोचणाऱ्या दगडांचा, काट्यांचा त्रास चुकविण्यासाठी आदिमानवाच्या काळात पायाला पाला किंवा झाडाची साल बांधण्याची पध्दत होती. ग्रीस, इजिप्त या देशातील उत्खननात त्यावेळची पादत्राणे मिळाल्याचा उल्लेख आढळतो. इ. स. पूर्व काळात पादत्राणे वापरली जात. नंतरच्या काळात मेलेल्या किंवा मारलेल्या प्राण्यांच्या चामड्याला योग्य आकार देऊन ते पायाला बांधले जाई.

भारतातील पादत्राणासंबंधी वैदिक वाड्:मयात उल्लेख आढळतो. रोमनकालीन पादत्राणांशी त्याचं साम्य आढळतं. पुणेरी जोडा, जयपुरी चढाव याबरोबरच कोल्हापुरी चपलांची निर्मिती झाली. पुणेरी जोडा जरी जवळ जवळ नाहीसा झाला तरी जयपुरी चढाव आणि कोल्हापुरी चप्पल मात्र टिकून आहेत. कोल्हापुरी चपलांची जुनी नावं म्हणजे खास कोल्हापुरी, खास कुरुंदवाडी, खास कापशी! गावांच्या नावावरुन दिलेली. शिवाय पुडा मोरकी, पुडा पॅचिंक, पुडा अथणी, गांधीवादी अशी नावे अलिकडच्या बदलत्या काळात म्हणजे चित्रपटांच्या जमान्यात कोल्हापुरी चपलेने सुरक्षा, सिलसिला, सुहाग, जंजीर, नाचे मयूरी, दिल, मेरी आवाज सुनो, महाभारत अशीही नावे धारण केली असली तरी आपला मूळचा दर्जा व वैशिष्ट्ये कधीच सोडली नाहीत.

कोल्हापूरी चप्पल पूर्णत: कातड्याची असल्याने उन्हाळयातसुध्दा थंडपणा जाणवतो. शिवाय चालताना त्रास होत नाही. कारण त्या पूर्णत: हाताने बनविलेल्या असतात. त्या बनविण्याचे ९० ते ९५ टक्के काम महिला कामगार करतात. कोल्हापूर जिल्ह्यात या चपला तयार करुन उपजीविका करणारी साधारणत: सात हजारावर कुटुंबे आहेत. चपलांची किंमत वापरलेल्या कातड्याच्या दर्जाप्रमाणे असते


AAMHI KOLHAPURI